रेल्वेकडून अपघाताची चौकशी सुरू   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंब्रा स्थानकावरील अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आहे. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली असल्याचेही फडणवीस म्हणाले.
 
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून ८ प्रवासी खाली पडले. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख

अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. जखमींना ५० हजार तर गंभीर जखमींना २ लाखांची मदत देण्यात येईल. त्यांचा उपचार हा पूर्णपणे शासनाकडून करण्यात येईल. ज्युपिटर रूग्णालयात दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांच्याही उपचारांचा खर्च हा सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
 

Related Articles